पार्किन्सन्सबद्दल

पार्किन्सन्स: प्राथमिक माहिती

ब्रिटीश चिकित्सक जेम्स पार्किन्सन यांनी १८१७ साली “An essay on a shaking palsy” या निबंधाद्वारे या आजाराची लक्षणे जगासमोर मांडली.त्यांच्या स्मृतीसाठी या आजाराला पार्किन्सन हे नाव देण्यात आले

साधारणपणे हा वृद्धांचा आजार असे म्हटले जाते..सरासरी वय ६० वर्षे मानले जाते पण तरुण लोकांमध्ये सुद्धा काहीवेळा हा आजार होऊ शकतो.आम्ही१५० पिडी रुग्णांची प्रश्नावलीद्वारे माहिती गोळा केली तेंव्हा ६० वर्षाखालील ४५% व्यक्ती आढळल्या यात पस्तिसिच्या आत पिडी झालेल्या ५व्यक्ती होत्या.

पिडीचे अस्तित्व शरीरावर लक्षणे दिसू लागल्यावरच समजते.आणि ही लक्षणेही मेंदूत डोपामाईन तयार करणाऱ्या पेशींची संख्या ६०ते७०% कमी झाल्यावरच दिसतात या आजाराची कारणे अजून निश्चित सांगता येत नाहीत जगभर याबाबतचे संशोधन चालू आहे. सर्वसाधारणपणे काही अनुवांशिक घटक,शरीरातील विषारी पदार्थ,वयोवर्धन,,वातावरणातील विषारी घटक,काही औषधे,यांच्या एकत्रित परिणामातून हां आजार होतो असे मानले जाते.

पार्कीन्संन्स होतो म्हणजे नेमके काय होते?

मध्यमेंदूमध्ये Substantia nigra या भागात डोपामिन नावाचे रसायन तयार होत असते शरीराची हालचाल व तोल सांभाळण्याचे कार्य ते करीत असते.पार्किन्सन्स रुग्णात डोपामिन तयार करणार्‍या पेशी हळूहळू कमी होऊ लागतात. त्यामुळे शरीराच्या हालचाली मंदावतात.कंप,ताठरता अशी इतर लक्षणेही दिसू लागतात.जसजसे या पेशी व त्यांचे कार्य कमी होता जाते तसतसे लक्षणे वाढत जातात

हात पाय कडक होणे(रिजिडिटी),शरिराला कंप्,हालचालित मंदत्व अशी सर्वसाधारण लक्षणे दिसायला लागली की हा येतोय असे समजायला हरकत नाही.अर्थात हे स्वतः ठरवायचे नाही तर न्युरॉलॉजिस्टचा सल्ला घ्यायचा.

लक्षणे

पुढे लक्षणांची भली मोठ्ठी यादी दिली आहे. याने घाबरुन जाण्याचे कारण नाही.कारण ही सर्व लक्षणे एकाच रुग्णात असतात असे नाही.काही लक्षणे एखाद्या व्यक्तीत कधीच असणार नाहीत:.काही आजार वाढल्यावर दिसायला लागतील.तसेच ही सर्व औषधोपचाराने पुरक उपचाराने आटोक्यात येऊ शकतात.

अ) प्राथमिक लक्षणे

१) कंप (Tremors) – या आजारात७०% ते ७५% लोकाना कंप हे लक्षण जाणवते.बहुसंख्य लोकाना हे लक्षण असल्याने कंप म्हणजेच पीडी असे समीकरण बहुतेकांच्या मनात असते..पार्किन्सन्सला मराठीतील प्रतिशब्द म्हणून कंपवात हा शब्द वाप्ररल्यानेही हे वाटू शकते.खरे पाह्ता आयुर्वेदानुसार कंप असणारे पीडी रुग्णच कंपवातात मोडतात.पीडीचे कंप नसलेले रुग्ण इतर वातविकारात मोडतात.पण त्याना कंपवात म्हणत नाहीत.

पार्किन्सन्स मध्ये सुरुवातीला एक हात कंप पाऊ लागतो. हळूहळू दुसरा हात,पाय हनुवटी असे कंपाचे प्रमाण वाढत जाते.पण कंप हे लक्षण इतर आजारातही असू शकल्याने कंप पार्कीन्संन्समुळेच आहे का हे तज्ज्ञांकडून तपासावे लागते.

प्रश्नावलीतील माहिती नुसार १५० पैकी१२५ जणाना म्हणजे जवळजवळ ८३.३३% % लोकाना कम्प हे लक्षण होते.. यातील ९६ जणांच्या पीडीची सुरुवात कम्पाने झाली.

२) हालचाली मंदावणे (Bradykinesia)

– रुग्णाच्या दैनंदिन हालचालीत मंदत्व येते.जेवणे, खाणे,स्नान, कपडे घालणे,बूट घालणे अशा दैनंदिन क्रियांना लागणारा वेळ वाढतो.काही जणांच्यात हालचालीबरोबर बोलणे, विचार करणे या बाबीही मंदावतात.

प्रश्नावलीतील माहितीनुसार १५० पैकी १०० जणाना म्हणजे जवळ जवळ ६६.६६% जणाना हालचाली मंदावण्याची समस्या जाणवली..

३)ताठरता (Rigidity)- या आजारात स्नायू कडक होतात कधीकधी त्यामुळे अंग दुखते.खूप काम केल्याने अंग दुखते,चुकीच्या पद्धतीने झोपल्याने दुखत असावे असे रुग्णाला वाटत राहते .पण हे दुखतच राहते .चेहर्‍यावरील स्नायुंच्या ताठरतेमुळे चेहरा निर्विकार भावविहीन होतो.चालताना हात हालणे बंद होते,डोळ्याची उघडझाप मंद होते.प्रश्नावलीतील माहिती नुसार १०६ शुभार्थीना ताठरतेची समस्या सतावते..

ताठरता कोणत्या भागात निर्माण होते हे व्यक्तीगणिक वेगळे आढळते श्वसनासाठी लागणारे बोलण्यासाठी लागणारे स्नायु ताठर झाल्यास बोलण्यावर परिणाम होतो. ही समस्या ८८ जणाना आढळली गिळण्यासाठी लागणारे स्नायु ताठर झाल्यास गिळण्याची क्रिया मंद होते..३३ शुभार्थीना गिळण्याची समस्या आहे. .

वरील तीन महत्वाच्या लक्षणा शिवाय इतरही काही लक्षणे आढळतात.

आ) इतर लक्षणे

१) .ह्स्तकौशल्य आणि हालचालीतील समन्वय(coordination) या बाबी कठीण होतात.काहीवेळा हालचालीतील मंदत्व आणि ताठरता या दोन्हीच्या एकत्रीकरणातुन हे होते काहीवेळा हे स्वतंत्रपणे लक्षण असू शकते.सुईत दोरा ओवणे,बोटानी बारीक गोष्ट उचलणे.इत्यादी.बाबी समस्या बनतात.हस्ताक्ष्ररात फरक पडतो.ते बारीक होत जाते.कम्प असल्यास लिहिणे कठीण होते. प्रश्नावलीतील माहितीनुसार १०३जणांच्या हस्ताक्ष त फरक झाला

२) शरीराचा तोल सांभाळता येत नाही.रुग्ण. पुढे वाकून चालतो चालताना जवळजवळ पावले टाकली जातात.प्रश्नावलीनुसार ८३व्यक्तीना तोल जाण्याची समस्या आहे.

३)इतर लक्षणात बद्धकोष्टता हे मह्य्वाचे लक्षण आहे.बर्‍याच शुभार्थींच्या आजाराची सुरुवातच बद्धकोष्ठतेनी होते.बद्धकोष्टता ही समस्या सर्वसाधारण ,असल्याने इतर लक्षणे दिसेपर्यंत हे पीडीचे लक्षण होते हे लक्षात येत नाही.प्रश्नावलीतील ५७ शुभार्थीना ही समस्या जाणवली.

४)तोंडातून लाळ गळणे,ही समस्या खरे पाहता गिळण्याशी संबंधितच आहे.ताठरपणामुळे तोंडातील स्नायुकडुन गिळण्याची क्रिया योग्यप्रकारे न झाल्याने लाळ गळते.४२ जणाना ही समस्या आढळली.

५)विसरभोळेपणा वाढणे ही तक्रार काहिना जाणवते.बर्‍याच वेळा ही तक्रार वृद्धत्वामुळेही असू शकते.प्रश्नावलीतील ५६ जणाना ही तक्रार आढळली.

६)झोपेच्या तक्रारी काही जणात आढळतात.वारंवार लघवीला जाणे,रात्री अचानक हाताचा कम्प वाढणे,मानसिक अस्वस्थता यामुळे झोपेच्या तक्रारी निर्माण होतात.निद्रानाशाची समस्या ३३ जणात आढळली.

७) लघवीला त्रास होणे,यात मुत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे,घाईघाईने मूत्रविसर्जन करावे लागणे असे प्रश्न निर्माण होतात.या समस्या साठीनंतरच्या पुरुषात पौरुषग्रंथीच्या वाढीमुळेही दिसू शकतात असू.

त्यामुळे ही लक्षणे पीडीची आहेत की पौरुषग्रंथीच्या वाढीमुळे हे तज्ञांकडुन तपासुन घेणे चांगले.

८)फ्रिजिंग म्हणजे अचानक पुतळा होऊन जाणे अशी अवस्था काहीची होते.प्रश्नावलीतील १८ जणाना ही समस्या आढळली.हालचालीचे मंदत्व,आणि ताठरता या दोन्हीच्या मिश्रणातून,तर काहीवेळा स्वतंत्र बाब म्हणूनही हे होऊ शकते.

९)नैराश्य हे आजाराचे महत्वाचे लक्षण आहे. काहीवेळा आजाराची सुरुवातच नैराश्याने होते.कोणताही आजार चिकटला की बर्‍याच जणाना तो स्विकारता येत नाही आणि नैराश्य येते.पीडीमध्ये हे होतेच, शिवाय मेंदुतील रसायनाच्या बदलामुळेही हे होते.बर्‍याचवेळा इतर लक्षणापेक्षा नैराश्याने वेढल्याने व्यक्ती अधिक अकार्यक्षम होते.

१०)भासाची समस्या ही आजाराचा भाग म्हणून तर काहीवेळा औषधाचा परिणाम म्हणून असू शकते.वेगवेगळ्या आकृत्या,माणसे,प्राणी दिसणे,काल्पनिक लोकांचे बोलण्याचे आवाज्,अशा तर्‍हेचे भास असू शकतात.ताप,झोपेचे चक्र बिघडणे,शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी होणे,वृद्धत्व अशी विविध कारणे यामागे असु शकतात

११)त्वचा तेलकट होते डोक्यात कोंडा होतो.फक्त ८ जणाना ही समस्या जाणवली.

उपचार

पार्किन्सनच्या बाबतीत हा आजार पूर्णपणे बरा होणार नाही हे रुग्णांनी व त्याच्या कुटुंबियानी प्रथम स्वीकारणे आवश्यक आहे. मधुमेह,रक्तदाब या आजाराप्रमाणे औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात.रोग पूर्ण बरा होत नसला तरी योग्य औषधोपचाराने अनेक लक्षणावर नियंत्रण आणता येते व रुग्णाचे जगणे सुसह्य होऊ शकते हे पुन: एकदा नमूद करावयास हवे.त्यामुळे उपचार पद्धती आजार न वाढता लक्षणे आटोक्यात यावीत अशीच असते.डोपामिनच्या कमतरतेने आजार होत असल्याने बाह्य मार्गाने डोपामिन देणे हे औषधौपाचारात महत्वाचे ठरते.याशिवाय डोपामाईन अगोनीस्ट याप्रकारची औषधे विकाराच्या सुरुवातीच्या अवस्थेत दिली जातात.ही डोपामाइन च्या निर्मितीला मदत करणारी द्रव्ये तयार करतात.या औषधामुळे आजाराच्या प्रगत अवस्थेतील लक्षणे विकसित होण्याचा काळ लांबविता येतो.

औषधाची परिणामकारकता कमी होऊन हालचालीवर मर्यादा येऊ लागल्यास शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो..काही लक्षणे दूर करण्यासाठी थलमोटोमी (Thalamotomy),पॅलिडोटॉमि (Pallidotomy)डीपब्रेन स्टीम्युलेशन (Deep brain stimulation) अशा शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत.सध्या तिसर्‍या प्रकारची शस्त्रक्रिया प्रचलित आहे. पार्किन्सन्स मित्रमंडळातील आठ रुग्णानी डीपब्रेन स्टीम्युलेशन ही शस्त्रक्रिया करुन घेतली आहे.शस्त्रक्रियाही पिडी बरा करत नाही तर लक्षणावरच उपाय करते.स्टेमसेल्सचा वापर करुनही प्रयोग झाले पण अजून तरी त्याला यश आले नाही.त्यामुळे पिडिवर स्टेमसेल उपचार असे सांगणार्‍या जाहिरातीपासुन सावध राहणे उत्तम

आधुनिक वैद्यकाप्रमाणे आयुर्वेद,होमिओपाथी,अक्युप्रेशर ,अक्युपन्क्चर,न्युरोथेरपी,ताई-ची,पुष्पौषधी,कलोपाचार युनानी कलोपचार असे अनेक पूरक उपचारही उपलब्ध आहेत.स्पीचथेरपी ,फिजिओथेरपी,योगासने,आहार हेही महत्वाचे ठरतात.अनेक लक्षणावर नियंत्रण आणण्यासाठी या सर्वाचा उपयोग होत असल्याचा अनुभव आहे.याबाबत विविध उपचार पद्धतीच्या तज्ञानी एकत्र येऊन संशोधन करण्याची गरज आहे.इतर उपचार करताना कोणाच्याही सांगण्यावरुन आधुनिक वैद्यकाचे बोट सोडायचे नाही हे मात्र पक्के ध्यानात ठेवावयस हवे.

पार्कीन्संन्स साठी उपचाराचे महत्व असले तरी पार्किन्सन्सला स्वीकारून पार्कीन्संन्ससंह आनंदी जीवन जगण्याची कला शिकणे हे रुग्णासाठी सर्वात महत्वाचे ठरते. पिडीला समजुन घेउन स्विकाराची अवस्था जितक्या लवकर येईल तितके पीडिसह आनंदानी जगणे शक्य होते आणि ही स्विकाराची अवस्था लवकर येण्यासाठी आणि टिकण्यासाठी डॉक्टराच्या सल्ल्याबरोबर, त्याला साथ हवी असते जोडीदाराची,कुटुंबाच्या सहकार्याची,स्वमदत गटाची.